राम गणेश गडकरी
पूर्ण नाव राम गणेश गडकरी
टोपणनाव गोविंदाग्रज, बाळकराम
जन्म २६ मे, इ.स. १८८५
मृत्यू २३ जानेवारी, इ.स. १९१९
कार्यक्षेत्र नाटककार, कवी, लेखक
भाषा मराठी
साहित्यप्रकार कविता, नाटके, विनोदी कथा
प्रसिद्ध साहित्यकृती नाटके:' एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन
वडील गणेश गडकरी
राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (२६ मे, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - २३ जानेवारी, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
जीवन
गडकर्यांचा जन्म २६ मे, इ.स. १८८५ रोजी तत्कालीन मुंबई प्रांतातील नवसारी येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकर्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकर्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.
महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कवित, लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.
नाटके
गडकर्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. गडकर्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकर्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकर्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.
* एकच प्याला
* पुण्यप्रभाव
* भावबंधन
* प्रेमसंन्यास
* राजसंन्यास
* वेड्याचा बाजार
काव्य
वाग्वैजयंती हा गडकर्यांचा एकमेव काव्यसंग्रह. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. मुक्तच्छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद दुसर्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करण्याची त्यांची पद्धत वाचकाच्या मनात कवितेला अधिक खोलवर नेते. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती 'राजहंस माझा निजला' ह्या कवितेत गडकर्यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितेसाठी गोविंदाग्रज हे टोपण नाव गडकर्यांनी घेतले होते.
विनोदी लेखन
गडकर्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकर्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकर्यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.
अन्य साहित्य
नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकर्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम १० पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतल्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींचे वैशिष्ट्य म्हणजे गडकर्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.
याशिवाय, गडकर्यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत.
* चिमुकली इसापनीती
* समाजात नटाची जागा
* नाट्यकलेची उत्पत्ती
* गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र
विस्तारित माहिती
मराठी नाट्यसंगीतमध्ये एकच प्याला नाटकाला काही विशेष महत्व आहे. एकच प्याला ह्या दोन शब्दांचा उल्लेख असंख्य चित्रपट, नाटक इ. मधे झालेला आहे. हे संगीत-नाटक लिहिल आहे राम गणेश गडकरी यांनी - असा माणूस ज्याला वयाच्या १९ वर्षापर्यंत मराठी नीट बोलता येत नसे.
गडकरींचा जन्म झाला २४ मे १८८५ रोजी नवसारी, गुजरातमध्ये. गरीबी आणि लहान असतानाच झालेला पितृशोक यामुळे नीट शिक्षण त्यांना घेता आले नाही. वयाच्या १९व्या वर्षी शालेय शिक्षण संपवल्यावर गडकरींनी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. पण गणितात नापास झाल्यावर पहिल्याच वर्षी कॉलेजला रामराम ठोकून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला.
गडकरींनी मग मराठी, संस्कृत आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषांमधील साहित्य वाचायला सुरूवात केली. त्यांनी संस्कृतमधील कालिदास आणि भवभूति, मराठीमधील ज्ञानेश्वर, मोरोपंत, केशवसुत आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि इंग्रजीमधील विलियम शेक्स्पियर, पर्सी शेली आणि मार्क ट्वेन यांच्या साहित्याच्या सखोल अभ्यास केला. गडकरींनी मग गोविंदाग्रज हे नाव घेऊन कविता आणि बालकराम हे नाव घेऊन विनोदी साहित्य लिहिण्यास सुरूवात केली. गडकरी लिहितात,
क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा, मग पुढे
कोल्हटकरांच्या संपर्कात आल्यावर, त्यांच्याकडुनच प्रेरणा घेऊन गडकरींनी संगीत नाटके लिहिण्यास सुरूवात केली. भाषेवर प्रभुत्व, चातुर्य आणि प्रचंड कल्पनाशक्तीची देणगी असल्यामुळे त्यांनी एकाहून एक अशी उत्तम नाटके लिहिली. आपल्या फक्त ३५ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी ४ संपूर्ण संगीत नाटके, ३ अपूर्ण संगीत नाटके, १५० कविता आणि काही विनोदी लेख इतकी साहित्यरचना केली.
१९१२ मध्ये सर्वप्रथम आल ते सामाजिक जीवनावर आधारलेल संगीत प्रेमसंन्यास. नंतर १९१७ मध्ये गडकरींनी लिहिल नाचत ना गगनांत हे उत्कृष्ठ पद असलेल संगीत पुण्य-प्रभाव.
कशी या त्यजू पदाला, प्रणतनाथ रक्षी कांत अशी उत्तमोत्तम पदे असलेल, सामाजिक जीवनातील दारूच्या दुष्परिणामांवर आधारलेला संगीत एकच प्याला गडकरींनी १९१९ साली लिहिल.
१९१९ साली हलक-फुलक विनोदी पण भावनिक अस संगीत भाव-बंधन नाटक त्यांनी लिहिला. हे नाटक पूर्ण लिहून झाल्यावर फक्त अर्ध्या तासाने वयाच्या केवळ ३४व्या वर्षी राम गणेश गडकरी वारले.
गडकरींची ३ संगीत नाटके अपूर्णच राहिली - गर्व निर्वाण, वेड्यांचा बाजार आणि राजसंन्यास. त्यापैकी वेड्यांचा बाजार नाटक चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.
गडकरींची नाटके समजण्यास थोडी कठीण पण उत्कृष्ठरित्या मांडलेली आहेत. त्यांनी त्यांच्या नाटकांमधून सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवले. त्यांची सर्व नाटके प्रचंड लोकप्रिय होण्याच कारण म्हणजे - अतिशय मजबूत पात्र-निर्मिती, उत्कृष्ठ संगीत आणि उत्तम विनोद. त्यांच्या नाटकंबरोबर, नाटकातील काही पात्रे देखील अमर आहेत. एकच प्यालामधील सिंधु, सुधाकर, भाव-बंधनातील घनश्याम, प्रेमसंन्यासमधला गोकुळ प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवलेल आहे.
विजय तेंडुलकर म्हणतात, गडकरी हे कालिदासानंतर भारतीय भाषेमधले सर्वोत्तम कवी-नाटककार आहेत. ठाणे महानगर पालिकेने १९७९ साली बांधलेल्या नाट्यगृहाला गडकरी रंगायतन असे नाव देऊन राम गणेश गडकरी यांचा गौरव केला. गडकरींच स्थान हे मराठी साहित्यामध्ये खूपच मानाच आहे आणि विशेषत: त्यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांनी तर मराठी नाट्यसंगीताची शोभा, किर्ती अजुनच महान झाली आहे.